मुंबई : बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे गुलाब चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ‘गुलाब’ असं ह्या चक्रीवादळाचं नाव असून पाकिस्तानकडून हे नाव देण्यात आले आहे. दक्षिण उडीशा – उत्तर आंध्र प्रदेश दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला 26 सप्टेंबरला संध्याकाळी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार ढगांनी किनारपट्टीचे क्षेत्र व्यापले आहे आणि अशा प्रकारे आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टी चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन तासांमध्ये चक्रीवादळ कलिंगपट्टणममधील किनारपट्टी ओलांडेल आणि गोपालपूर, कलिंगपट्टणमच्या उत्तरेस सुमारे २५ किमी पुढे सरकेल. किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्याने ९० किमी प्रति तास वेगाने वेग वाहत आहेत.